Skip to main content

वास्तुशांती



                                    वास्तुशांती 
(टीप :ज्यांचा भारतीय शास्त्रांवर विश्वास नाही, श्रद्धा नाही, त्यांच्यासाठी हा लेख नाही. त्यामुळे त्यांनी आक्षेप कृपया मांडू नयेत. ज्या श्रद्धावंतांना खरोखरीच शंका आहेत, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.)
               वास्तुशांती बद्दल अगदी जाणकार व अभ्यासकांच्या सुद्धा मनात काही गैरसमज आहेत असे गेल्या काही महिन्यांपासून लक्षात येत आहे. त्यामुळे वास्तुशांती बद्दल मी काही लिहावे व गैरसमज दूर करावे अशी सूचना, विनंती काहीजण सातत्याने करत आहेत व त्यासाठी पाठपुरावा सुद्धा करत आहेत. वेळेत लेख पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल या  सर्व शास्त्र प्रेमी मित्रांची आधी क्षमा मागतो. 

                          वास्तुशांती म्हणजे काय? 
   वास्तुशांती म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधी शांती म्हणजे काय समजून घ्यावे लागेल. 
अ) शांती म्हणजे काय? 
                ।। यथा शस्त्रप्रहाराणाम् कवचं निवाकम्
                तथा दैवोपत्रणांतानाम् शांतिर्भवति वारणम्।। 

  असा श्लोक  ' शांती  ' ची व्याख्या करताना आला आहे.  ज्या प्रमाणे एखादे कवच किंवा चिलखत एखाद्या शस्त्राच्या प्रहारापासून  आपले संरक्षण करते, त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट प्रकारच्या दोषांमुळे जे दैवि अपघात,  त्रास  आपल्या आयुष्यात घडण्याची शक्यता आहे, अशा अपघात, त्रासांपासून व त्यामुळे येऊ घातलेलं जे संभाव्य दुःख आहे, त्या दुःखापासून जी गोष्ट आपले संरक्षण करते तीला 'शांती' असे म्हणतात. 
       समजा एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस ग्रहस्थिती चांगली नसेल तर अशा दोषांमुळे जे त्रास त्या व्यक्तीला भविष्यात होण्याची शक्यता आहे, त्या त्रासापासून रक्षण करण्यासाठी त्या विशिष्ट जनन दोषाची शांती केली जाईल त्याला त्या विशिष्ट नावाची जनन शांती म्हणून ओळखलं जातं . तसंच वास्तुमधील दोषांमुळे त्या घरातील व्यक्तींना त्यांच्या भावी आयुष्यात जो त्रास होण्याची शक्यता आहे त्या त्रासापासून रक्षण करण्यासाठी जी शांती केली जाते तीला वास्तुशांती असं म्हणतात. 

     *वास्तुशांती म्हणजे वास्तु मधील दोषांमुळे होणारे  संभाव्य दुष्परिणाम कमी करण्यासाठी केलेली शांती
    हे तर आपल्याला कळलं, पण वास्तु म्हणजे काय हे मात्र अजून आपण पाहिलं नाही. तेव्हा वास्तु म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. 
     ब)  वास्तु म्हणजे काय?
           
            ।। तैतिलाश्च नराश्चैव यस्मिन्यस्मिन् परिष्ठिताः 
             तद्वास्तु सूरिभिः प्रोक्तां तथावै वक्ष्यते धुना ।। 

         ।। भूमी प्रासाद यानानि शयनंच चतुर्विधम् 
               भूरैव मुख्य वास्तुस्याद् तत्र जातानियानिः।। 
        
             ।। धरा हर्म्यादि यानंच पर्यंकादि चतुर्विधम् 
             धरा प्रधान वास्तुस्याद् तत्तज्जातिषु सर्वषः।। 

      जमीन (प्लॉट), मंदीर (प्रासाद म्हणजे मंदीर), वाहन व आसने व पलंग हे वास्तुचे 4 भाग असले तरी भूमि ही त्यातील महत्वाची वास्तु आहे. तिसऱ्या श्लोकात  धरा, हर्म्य (ईमारत), वाहन व आसने/पलंग या चार वास्तुच्या भागांपैकी धरा म्हणजेच जमीन महत्वाची वास्तु आहे असे म्हटले आहे. याला कारण असे की बाकी सर्व वास्तु या जमिनीच्या आश्रयाने उभ्या असतात. 
       देवता आणि मनुष्य ज्या ज्या ठिकाणी राहतात अशा सर्व ठिकाणांना आपल्या थोर पुर्वजांनी, पुर्वसुरींनी वास्तु असे म्हटले आहे.
        
        * थोडक्यात जमीन (कंपाऊंड असलेली) अथवा ईमारत किंवा                  कोणतेही बंदिस्त स्पेस म्हणजे वास्तु होय. 

       ।। विमानादिनी वास्तुनी वस्तुत्वात् वस्तु संश्रयात
            तान्येव वास्तुरेवैति कथितं वास्तु विद्बुधैः।। 

        ।।  प्रासादादिनी कर्माणि वस्तुत्वाद्वस्तु संश्रयात
             वस्तुभिर्निर्मितत्वाच्च वास्तुनिती स्मृतानिच।। 

         ( विमान म्हणजे विविध मोजमापे वापरुन म्हणजे खरंतर विविध आय व्ययादि गुण असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांचा कॉम्प्लेक्स.)   विमान व इतर वास्तुंच्या आश्रयाने वस्तू राहत असतात तसेच या सर्व वास्तुंची निर्मिती वस्तू पासून झालेली असते म्हणून त्यांना वास्तु असे म्हणतात. 
      
* ढोबळ अर्थ घ्यायचा झाला तर कोणतीही वास्तु वेगवेगळ्या वस्तूंपासून किंवा वेगवेगळ्या वस्तू जोडून तयार होते. व अशाप्रकारे तयार झालेल्या वास्तूंमध्ये वस्तू राहतात म्हणून त्यांना वास्तु असे म्हणतात. पण वास्तवात हा एवढाच वरवरचा अर्थ अभिप्रेत नाही,  
    वस्तू म्हणजे काय हे सांगताना शास्त्राने काय व्याख्या केली आहे ते पाहू.
         ।। सर्वेषु भूतेषु यद् वसति तद् वस्तुः।। 

       सर्व भूतांमधे जे वसते , राहते ते म्हणजे वस्तू.  म्हणजेच सर्वाभूती राहणारे चैतन्य, परब्रह्म, परमात्मा होय. म्हणजेच चैतन्यातून निर्माण झालेली व ज्यात चैतन्य राहते अशी स्पेस म्हणजे वास्तु होय. पण एवढी सखोल  चर्चा  इथे अपेक्षित नाही. तेव्हा सध्या वरचा ढोबळ अर्थ  लक्षात घेतला तरी पुरेसे आहे. 
       वरच्या चर्चेतून एवढं नक्की स्पष्ट होतं की वास्तु म्हटलं म्हणजे त्यात मंदीर, घर, प्लॉट, गाव, नगर, किल्ला, अशा कोणत्याही बंद स्पेसचा अंतर्भाव होतो

वास्तुशांती कुठे  करावी?  कधी करावी? का करावी? 

      जवळपास सर्वच वास्तु ग्रंथांमधे सर्व प्रकारच्या वास्तुंमधे वास्तुशांती करावी असे सुचवले आहे. पण तरी काही जाणकारांनी मंदिरामध्ये वास्तुशांती करायची आवश्यकता नाही असे मत मांडले आहे. मुळात त्यांचा याविषयी पूर्ण अभ्यास नाही हे अशा मतामागचे खरे कारण आहे हे खालील भाग वाचून तुमच्या सुद्धा  लक्षात येईल. आता वास्तुशांती बद्दल ग्रंथांमधे आलेला  काही महत्त्वाचा भाग पाहू. 

        ।।  ग्रामे वा नगरे वापि दुर्गे वा पत्तनेपिवा 
           प्रासादेच प्रपायांच जलोद्यान तथैव च 
           यस्त्वां न पूजयेन्मर्त्यो मोहाद्वास्तुनरःप्रभो 
           आश्रियं मृत्युमाप्नोति विघ्नस्तस्य पदे पदे।। 

      (गांव, नगर, किल्ला, पाणकिल्ला, मंदिर, पाणपोई, वाॅटरपार्क अशा सर्वच प्रकारच्या वास्तुंमधे जर कोणी वास्तु पूजन करणार नाही तो स्वतः मृत्युच्या आश्रयाला जाईल. किंवा त्याला पदोपदी विघ्ने येतील.) 
     आणखी अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. जागा आणि वेळेअभावी आणखी चर्चा करत नाही. 

       * वर स्पष्ट उल्लेख आहे की सर्व प्रकारच्या वास्तुंमधे, मंदिरात सुद्धा वास्तुशांति करावी. 
            तसंच अगदी पाणपोई वा वाॅटरपार्क सारख्या वास्तु मध्येही                  करावी. 

            वरचे आधार दिल्यानंतरही आमच्या एका परिचीत पंचांग  अभ्यासकाने उपस्थित केलेला प्रश्न मात्र चिडचिड वाढवणारा होता. पण मीच स्वतःला समजावले की ही त्यांची चूक नाही. मूलतः त्यांचा अभ्यास हा वास्तुशास्त्राचा नाही. त्यामुळे असे अपुऱ्या माहितीवर आधारीत प्रश्न येणारच. प्रश्न असा होता-  "पण प्रासाद म्हणजेच मंदीर कशावरून?" 
    या शंकेच्या निरसनार्थ काही  आधार खाली देतो आहे. 

 1) प्रासाद वास्तुचे बांधकाम कसे करावे यासंबंधी जी वास्तु विषयक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे त्या सर्व ग्रंथांमधे गर्भगृह कसे असावे, जगती, सभामंडप, तोरण, शिखर, कळस कसे असावे,  व मूर्ति लक्षण प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या देवतांची  मूर्ति कशी असावी हे सांगीतले आहे. अर्थात सर्व माहिती, नियम मंदिर वास्तु विषयक आहेत. या शिवाय प्रासादाचे भेद म्हणजे प्रकार जसे द्राविड, वेसर, नागर व इतर भेदांविषयी नियम आहेत. 
        आता कोणीही सामान्य व्यक्ति  सुद्धा निःसंदेह सांगू शकेल की प्रासाद म्हणजेेच मंदिर. 

2) प्रासादाची व्याख्या करतांना खुपच समर्पक शब्दात ग्रंथ कर्त्यांनी केली आहे. 
        "।।  देवादिनां नराणां च येषु रम्यतया चिरं
           मनांसिच प्रसीदंति प्रासादे तेन कीर्तिताः।।" 
       
    देवता व मनुष्य जिथे चिरकाल आनंदाने करु शकतात व जे स्थान मनाला, चित्ताला प्रसन्न करतं ते म्हणजे प्रासाद होय. 
     
     आणखी अनेक संदर्भ व आधार उपलब्ध आहेत. पण जागा व वेळेअभावी इथे सर्व चर्चा करता येणार नाही. 
   
  * इथे आपण पाहिले की प्रासाद म्हणजेच मंदिर. व वरच्या आधारभूत श्लोकात  मंदिरात सुद्धा वास्तुशांति करावी असे सुचवले आहे.

      
             ।। आहारो वैश्वदेवान्ते नूनमस्य भविष्यति 
             वास्तुपशमनो यज्ञस्तवाहारो भविष्यति 
            यज्ञौत्सवादौच बलिस्तवाहारो भविष्यति 
            वास्तुपुजामकुर्वाणस्तवाहारो भविष्यति 
            अज्ञानात्तु कृतो यज्ञस्तवाहारो भविष्यति 
             एवमुक्तस्ततोह्रृष्टः स वास्तुरभवत्तदा।। 
      
             वास्तुपुरूषाच्या कथेत ब्रह्मदेवाने वास्तु पुरूषाला दिलेल्या वरदानाचे वर वर्णन आहे. ब्रह्माने वास्तु पुरुषाला त्याच्या आहाराची व्यवस्था लावताना सांगितले, की वैश्वदेवाला दिलेला आहार तुला प्राप्त होईल. वास्तुशांती मधील यज्ञातील आहुती तुला पोचतील. यज्ञातील बलि तुझा आहार होईल. जो वास्तुशांती करणार नाही तो तुझा आहार होईल. अज्ञानामुळे परिपूर्ण न झालेला यज्ञ सर्वथा वाया जाणार नाही तर त्यातील आहुती व बली तुला प्राप्त होईल. इथेही वास्तुशांती न करणारा स्वतः तुझा आहार होईल असे म्हटले आहे.
  
* वास्तुतील  वास्तु पुरुषाला  म्हणजे  चैतन्याला या वास्तुशांतीच्या यज्ञातील आहुती मिळतात. आहार मिळाला की कोणीही पुष्ट होत असतो. याशिवाय  त्यातील वेदोक्त मंत्रांची स्पंदनेही वास्तुला शुद्ध करत असतातच. थोडक्यात वास्तुशांती करून एकप्रकारे आपण त्या चैतन्याला किंवा वास्तुपुरूषाला  व बिल्ट स्पेस ला आणखी पुष्ट करत असतो,  बलशाली करत असतो. एक अप्रतीम स्पंदनांनी युक्त बिल्ट स्पेस तयार करत असतो. 
      आपण नेहमी वास्तुपुरूष वास्तुपुरूष असा पुल्लिंगी उल्लेख करत असतो पण  आपण बांधलेल्या व बंदिस्त केलेल्या पोकळीला/ बिल्ट स्पेसला मात्र ती वास्तु असे स्त्री लिंगी का संबोधतो? कधी विचार केलाय यावर? तो केला तर लक्षात येईल की आपली शास्त्र किती खोल विचार करतात. 
     चैतन्य म्हणजे शिव आहे. शिव तत्वाचा अंश.  ते अतिशय निर्मितीक्षम आहे (potent). त्या चैतन्याला आपण वास्तुपुरूष म्हणतो. प्रत्येक बंदिस्त स्पेस मध्ये हे चैतन्य अस्तित्वात असतेच. मंत्रांच्या माध्यमातून ते आपण आणखी स्पंदनशील व निर्मिती क्षम बनवत असतो. प्रत्यक्षात आपल्या ईच्छा, आकांक्षा, स्वप्न, ध्येय, आराखडे, या सगळ्याचे मॅनिफेस्टेशन (मूर्त स्वरूपात येणं, प्रत्यक्षात येणं, घडणं,) हे या स्त्री रुपी बिल्ट स्पेस मधे म्हणजे ही जी स्त्री रुपी वास्तु आहे, त्यात होतं. बाळाचा जन्म ही असाच होतो नं? पुरुष तत्वाचं  नुसतं निर्मिती क्षम बीज असून उपयोगाचं नाही प्रत्यक्ष निर्मिती साठी लागते ती निरोगी, निकोप स्त्री रुपी स्पेस. यातील वास्तु पुरुष हे चैतन्य बीज आहे ते म्हणजे potential energy. तर ती वास्तु म्हणजे स्त्री रुपी working force म्हणजे  kinetic energy होय जीला आपलं तत्वज्ञान शक्ती म्हणतं. 
      वास्तुशांती करताना हे वास्तुपुरूष रुपी बीजाचे आपण प्रातिनिधिक रोपण त्या वास्तुमधे करत असतो. आता वास्तु जेवढी निरोगी, निर्दोष, तेवढं आपल्या आपल्या ईच्छा आकांक्षा व स्वप्नांचं मॅनिफेस्टेशन जसंच्या तसं होईल. म्हणजेच आॅर्डरली मॅनिफेस्टेशन होईल अन्यथा डिसऑर्डरली मॅनिफेस्टेशन होईल. म्हणजे अर्धवट स्वप्नपूर्ती. 

            ।। वज्राभिदूषीते भग्ने सर्पचांडालवेष्टीते
                उलूकवासिते सप्तरात्रौ काकाधिवासिते
               मृगाधिवासिते रात्रौ गौमार्जाराभिनादिते
                वारणाश्वादिवीरूते स्त्रीणां युद्धाभिदूषिते
                कपोतकगृहवासे मधूनां नीलये तथा
               अन्यैश्चैव महोत्पातैर्दूषिते शांतिमाचरेत ।।

        घरावर शस्त्र पडले असेल, घर भग्न झाले असेल, घराभोवती सापांचा वावर जास्त असेल, जे वाईट गोष्टींच्या आधारे स्वतःची उपजीविका चालवतात अशा लोकांची घराभोवती वस्ती असेल,  घरात घुबड येऊन राहून गेले असेल, घरात सात रात्री कावळा राहून गेला असेल, घरात हरीण येऊन गेले, रात्री घरात गाय किंवा मांजर विचित्र आवाजात ओरडत असेल, घोडा विचित्र आवाजात दिवसा ओरडत असेल, स्त्रियांच्या कारणाने घरात सातत्याने वाद व भांडणे होत असतील, घरात कबुतर येत असेल, सातत्याने घरात  मधमाश्या पोळं बनवत असतील तर ही सर्व त्या घरात महादोष असल्याची लक्षणे आहेत. या व्यतिरिक्त आणखी महादोष घरात असल्याचे माहिती असेल तर वास्तुशांती करा. 
    
   * इथे दोषनिवारणासाठी सगळ्यात आधी फक्त वास्तुशांतीचा उल्लेख ग्रंथकारानी केला आहे व वास्तुशांतीचे महत्वच विश्वकर्म्याने अधोरेखित केले आहे. वास्तुशांती हा वास्तुदोष निवारणासाठी एक सर्वोत्तम उपाय म्हणून आपल्या ग्रंथाच्या सुरवातीलाच सांगितला आहे. परिपूर्णपणे केलेल्या वास्तुशांतीचे अप्रतिम परिणाम आमच्या अनेक क्लायंट्सनी अनुभवले आहेत.  

   
    बिल्डिंग ची वास्तुशांती केली तरी फ्लॅटची वास्तुशांती केली पाहिजे का? 
     
     सर्वप्रथम या प्रश्नाचे उत्तर ' हो' असे आहे हे सांगतो. याला आधार काय? 
              ।। एक एव पुमानेषु बहुधा परिष्ठिताः  
                 सर्वस्मिन्नपि संस्थाने विभक्ते लक्षयेत ततः।। 
    
     एकच वास्तुपुरूष सर्व ठिकाणी व्यापून राहीला आहे. जेव्हा आपण वास्तुचे वेगवेगळे भाग करतो म्हणजे वेगळी संस्थाने(युनिट्स) करतो तेव्हा त्या प्रत्येक संस्थानात वेगळा वास्तुपुरूष म्हणून विचारात घेतला पाहिजे. अर्थातच त्याची स्थापना सुद्धा प्रत्येक संस्थानात वेगवेगळी केली पाहिजे. 
         बिल्डिंग ही कॉमन वास्तु आहे. तीच्या वास्तुशांतीचे परिणाम सर्वांना विभागून जाणार आहेत. तसेच बिल्डिंग या वास्तुच्या आराखड्यामधे असलेल्या दोषाची शांति केली तरी फ्लॅट म्हणुन जे केवळ आपल्या मालकीचे संस्थान आहे त्यातील दोषांचे निराकरण करण्यासाठी फ्लॅट या वेगळ्या युनिटची वेगळी वास्तुशांती करावी लागेल. ज्याप्रमाणे बिल्डिंगचा परिसर व जीना झाडण्यासाठी माणूस  ठेवलेला असतो व त्याने बिल्डिंगची साफसफाई केली तरी आपण आपला फ्लॅट झाडून पुसून साफ करतोच. त्याचप्रमाणे वास्तुशांती सुद्धा वेगळ्या वास्तुमधे वेगवेगळी करणे गरजेचे आहे. 

    वास्तुशांती कधी करावी? 

     काही प्राचीन वास्तु  ग्रंथकारानी वास्तुशांती कधी करावी या बद्द्ल थोडी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. मुख्यतः जवळजवळ  प्रत्येक ग्रंथात वास्तु बांधून पूर्ण झाल्यावर त्या वास्तुमधे राहायला  जाण्याआधी वा ती वास्तु वापरण्यास सुरुवात करण्याआधी  तिथे  वास्तुशांती करावी असे मत मांडले आहे. व या मताबद्दल कुठे विरोधी मत दिसत नाही. 
    वेगवेगळ्या ग्रंथांत एकापेक्षा जास्त वेळा जसं कुठे 3 वेळा तर कुठे 5 वेळा वास्तुशांती करण्यासंबंधी मत प्रदर्शित केलं आहे. त्यातील फक्त एका श्लोकाचा इथे विचार करू. व त्यानंतर मी  माझे यावरील मत सुद्धा व्यक्त करणार आहे. 
    
            ।। भुवनपुरपतीनां सूत्रणे पुवमाद्या 
                कथित इह पृथिव्यां शोधने च द्वितीयः 
                तदनुमुख निवेशे स्तंभ संरोपणे च 
                 भवनवसनकाले पंचधा वास्तुयज्ञः।।
    
        वास्तु बांधण्यासाठी राजाकडून  (आजच्या काळात वास्तु बांधण्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार असणाऱ्या  स्थानिक सरकारी कार्यालयातून) परवानगी मिळाली की त्या प्लॉटची वास्तुशांती करावी. ही पहिली वास्तुशांती होय. 
     लाईन आऊट करून खुदाई झाल्यावर दुसरी वास्तुशांती करावी. 
  दरवाजाची चौकट बसवताना तिसरी, स्तंभ उभे झाल्यावर चौथी तर त्या वास्तुमधे राहायला जाण्याआधी पाचवी वास्तुशांती करावी. 

     *वास्तुशांती मुख्यतः दोषनिवारणासाठी आहे. थोडा विचार केला तर कळेल की कधी ती घर बांधण्यासाठी निवडलेली जमीनच दोषपूर्ण असते त्यामुळे निर्माण झालेल्या दोषांचे निराकरण करण्यासाठी  वास्तुशांती करावी लागते, कधी  घरासाठी  खुदाई करतांना आपण नकळत  मुंग्या, किटक, यांची घरं उध्वस्त करत असतो व त्यामुळे निर्माण झालेल्या दोषांचे निराकरण करण्यासाठी  वास्तुशांती करावी लागते,  घरासाठी लागणारे लाकूड मिळवण्यासाठीआपण झाडे तोडत असतो म्हणून शांती (स्तंभ आणि द्वारासाठी)  , आणि शेवटी कळत नकळत राहीलेले, चुकून निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी पाचवी वास्तुशांती सुचवली आहे. आता सर्व प्रकारच्या दोषांचे निराकरण होऊ शकेल ते खरं तर पाचव्या वास्तुशांती मुळे. त्यामुळे माझ्या मते वास्तु वापरायला सुरुवात करण्या आधीची, राहायला जाण्याआधी म्हणजेच बांधकाम पुर्ण होऊन वास्तु वापर करण्यालायक झाल्यावर करता येणारी जी पाचवी वास्तुशांती आहे ती करणे सगळ्यात महत्वाचे व सोपे सुद्धा. आणि आजच्या काळात आपण फक्त ही पाचवी वास्तुशांतीच करतो. आणि ते चूक ही नाही. 
       
     वास्तुशांती कधी करावी या बद्द्ल वेगळे ग्रंथकार अजूनही काही वेगळ्या गोष्टी सुचवतात. त्यात वरील पाच वेळा वास्तुशांती करण्यासंबंधीच्या मतापेक्षा थोडे वेगळे मत ही दिसते. 
           ।। प्रासाद भवने तडागखनने कूपे च वापीवने
                जीर्णोद्धारे पुरे च यागभवने प्रारंभनिर्वर्तने
                वास्तोः पूजनकं सुखाय कथितं पूजा विना हानये।। 

     * मंदिर, घर, तलाव, विहीर, बाग, यज्ञभवन, नगर या सर्व वास्तुंच्या निर्माणाचे काम सुरु करतेवेळी व पुर्ण झाल्यावर तसेच या सर्व वास्तुंच्या जीर्णोद्धाराच्या सुरूवातीला व काम पूर्ण झाल्यानंतर वास्तुशांती करावी. 
       थोडक्यात मंदिर, घर, फ्लॅट, बंगला तसेच इतर सर्व वास्तुंच्या रिनोवेशनच्या कामाआधी व नंतरही वास्तुशांती करावी. इथे पुन्हा सांगतो की किमान काम पुर्ण झाल्यावर तरी वास्तुशांती करावी. 
       
        वास्तुशांती संबंधी नेहमी विचारल्या जाणाऱ्या शंका

      1) ग्राऊंड फ्लोअर वर नसलेला फ्लॅट म्हणजे अधांतरीच आहे. मग असं असताना जमिनीखाली निक्षेप करायला सांगितलेला वास्तुपुरूष लादीखाली निक्षेप करण्यात काहीच अर्थ नाही. 
     उत्तर : मुळात आपण फ्लॅट मधे काही अधांतरी राहात नाही. आपली वास्तु ही कोणत्याही मजल्यावरील असली तरी भूमीच्या आधारानेच उभी असते. जोपर्यंत आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर नाही, तोपर्यंत आपल्यावर पृथ्वीच्या दीशांचा प्रभाव आहेच. एकदा अशा परिस्थितीतील स्पेस म्हटले की वास्तुचे नियम लागू होतातच. फक्त अशावेळी आपण ज्याचा आधार घेऊन चालतो, उभे राहतो ते फ्लोरिंग म्हणजे आपली जमीन. त्यामुळे अशा वेळी फ्लोरिंग खाली वास्तु पुरुषाचा निक्षेप करावा. 

    2) एकदा वास्तुशांती केली की पुन्हा करायची आवश्यकता नाही 
     उत्तरः वास्तुशांती करताना वास्तुपुरूष योग्य ठिकाणी केला असेल तर वास्तुशांती पुन्हा करायची आवश्यकता नाही हे बरोबर. वास्तुपुरूष योग्य ठिकाणी निक्षेप केला असेल तरी नंतर वास्तुचे नूतनीकरण केल्यास पुन्हा वास्तुशांती करावी. 

   3) वास्तुपुरूष देवघरात, तिजोरीत ठेवला किंवा गुरुजींना दान दिला तर चालेल का? 
      उत्तरः वास्तुपुरूष फ्लोरिंग खाली निक्षेप करणेच योग्य आहे.



वास्तुशांती करताना काय काळजी घ्यावी ? 
     

     1) वास्तूशांती हा उपाय आहे. कोणताही उपाय, औषध घेण्यासाठी नियम असतात. ते पाळले की परिणाम उत्तम. 
    
    2) रविवारी व मंगळवारी वास्तुशांती चे मुहूर्त नसतात. 

    3) गृहप्रवेश स्थिर लग्नावर करावा. वास्तुशांतीच्या मुहूर्ताच्या मर्यादेच्या आत करावा

    4) पंचांगात दिलेले सगळेच मुहूर्त घरातील सर्व लोकांना लाभदायक नसतात. त्यामुळे त्यातील लाभणारे मुहूर्त जाणकार व्यक्ति कडून काढून घ्यावे व त्यातील आपल्या सोयीचा मुहूर्त निवडावा. 

   5) वास्तुपुरूषाचा निक्षेप आग्नेयेत करावा.

   6) वास्तुपुरूषाचे डोके ईशान्येकडे व पाय नैऋत्येकडे असावेत. 

   7) वास्तुपुरूष औदुंबराच्या डबीत ठेऊन निक्षेप करावा. 

   8) वास्तु पुरूषाच्या बरोबर रत्न, समुद्र वाळु, शेवाळ ई. वस्तु टाकाव्यात. 

  9) वास्तुपुरूष सोन्याचा असावा. 

 10) वेदोक्त मंत्रांसहीत वास्तुशांती करावी. 

 11) रंगीत(त्या त्या देवतेच्या रंगानुसार) मांडणी केल्यास अधिक चांगले परिणाम. 

 12) मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा करून तिची विधीवत स्थापना करण्या आधी मंदिराची वास्तुशांती करणे आवश्यक आहे. स्पेस
 

   जागेअभावी व वेळेअभावी सगळेच बारीकसारीक मुद्दे इथे घेता येणार नाही. जिज्ञासूंनी खालील मो. क्रमांकावर संपर्क करावा. 
      
                                                   अमोल लेले 
                       Tathastu vaastu  Research foundation 
                               (9004813975 / 8850517626)
            
     
      
    


         

Comments

  1. वास्तू पुरुष मंदिराची प्राणप्रतिष्ठा करताना कोणत्या दिशेस निक्षेप करावा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आधी वास्तुशास्त्र तर समजून घ्या.

*कोणीतरी मला फॉरवर्ड केलेला लेख व त्याला माझे उत्तर*        *फॉरवर्डेड लेख* *वास्तु* केवढी पवित्र जागा! जिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक...

वास्तु नुसार व्यक्ति की व्यक्ति नुसार वास्तु?

प्रश्न आहे वास्तु नुसार व्यक्ति की व्यक्ति नुसार वास्तु? इथे पुन्हा अगदी पायाभूत गोष्टीं (बेसिक्स) पासून विचार करावा लागेल. मुळात वास्तु म्हणजे काय? "प्रासादादिनी वास्त...